बीएसयुपी योजनेतील लभार्थ्यांच्या हाती लवकरच घरकुलांची चावी: सरनाईक

Share

प्रतिनिधी : मिलन शहा

मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या जनतानगर झोपडपट्टीतील बी.एस.यु.पी. (Basic Services for Urban Poor) योजनेतील घरे पात्र लाभार्थ्यांना लवकरच मिळणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या योजनेबाबत नागरिकांमध्ये नाराजी होती. त्याची गंभीर दखल घेऊन श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी तत्काळ पावले उचलली आहेत.
मंत्री सरनाईक यांनी महानगरपालिका आणि गृहनिर्माण विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, सर्व तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुलांची चावी द्यावी. तसेच, या योजनेंतर्गत काही सदनिका खोट्या लाभार्थ्यांच्या नावे वाटप झाल्याचे आढळून आले असून, अशा बनावट वाटपांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस उपआयुक्त, गुन्हे शाखेला दिल्या आहेत. याशिवाय, पात्र नागरिकांची अचूक यादी मिळावी यासाठी एका महिन्याच्या आत बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

या संदर्भात बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की,
“मीरा-भाईंदरकरांच्या घरकुल प्रश्नावर तोडगा काढणे हीच माझी प्राथमिकता आहे. बी.एस.यु.पी. योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना सुरक्षित व कायमस्वरूपी घरे मिळावीत, हेच आमचे उद्दिष्ट आहे. लवकरच लाभार्थ्यांच्या हातात घरकुलांची चावी देऊन त्यांचे स्वप्न साकार करू.”

या निर्णयामुळे मीरा-भाईंदरमधील शेकडो कुटुंबांना दिलासा मिळणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.


Share

One thought on “बीएसयुपी योजनेतील लभार्थ्यांच्या हाती लवकरच घरकुलांची चावी: सरनाईक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *