
वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले: सुरेशचंद्र राजहंस
मुंबई,भाजपाचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून सर्वच स्तरावर सपशेल फेल झाले आहे. महागाई व बेरोजगारीचे आकडे दिवसेंदिवस वाढतच आहेत. नोव्हेंबर महिन्यात बेरोजगारीचा दर 8 टक्के झाला असून शिक्षण घेऊन नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचे स्वप्न अंधःकारमय झाले आहे परंतु मोदी सरकारला त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देणारे मोदी आता केवळ 72 हजार जागांची नियुक्ती पत्रे देऊन तरुणांची बोळवण करत आहेत, अशी टीका मातंग समाजाचे नेते व काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
देशात तरुण वर्गाची संख्या जवळपास 65 टक्के असून शिक्षण घेऊन ते वर्षानुवर्षे नोकरीची प्रतिक्षाच करत आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी झाली आहे. नवीन रोजगार निर्मिती होत नाही तर उलट आहे तेच रोजगार कमी होत आहेत. नोटबंदी व जीएसटीची चुकीच्या पद्धतीने केलेली अंमलबजावणी यामुळे नोकरी देऊ शकणारे क्षेत्रच उद्ध्वस्थ होत चालले आहे तर दुसरीकडे खाजगीकरणाचा सपाटा लावून सार्वजनिक उद्योग विकले जात आहेत. दर वर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे स्वप्न दाखवणारे मोदी व भाजपा सरकार आता केवळ 72 हजार पदांची नियुक्ती पत्रे देत आहेत. तर शिंदे-फडणवीस सरकार ७५ हजार नियुक्ती पत्रे देत आहेत, तरुणांची ही घोर थट्टा आहे.
महाराष्ट्रात सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरु असून 18 हजार पदांसाठी तब्बल 13 लाख इच्छुकांनी अर्ज दाखल केले असून अर्ज भरण्याची प्रक्रिया अजूनही सुरुच असल्याने हा आकडा आणखी वाढणार आहे. यात अनेक उच्च शिक्षित तरुणांनीही अर्ज दाखल केले आहेत. 18हजार जागांसाठी 13 लाख अर्ज हे बेरोजगारीचे भीषण वास्तव दाखवणारे चित्र आहे. या तरुणांच्या हाताला काम देण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले असून बेरोजगारी ही मोठी चिंता करायला लावणारी आहे असेही राजहंस म्हणाले.