
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,भारत हा कृषिप्रधान देश आहे.भारताच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये अन्नदाता शेतकरी ओनम, पोंगल, विशू, गुढीपाडवा, उगाडी, लोहरी, बैसाकी, मकरसंक्रांत अशा वेगवेगळ्या नावाने हे सण साजरे करत असतात.

महाराष्ट्रातील महाराष्ट्रीयन ईस्ट इंडियन ख्रिस्ती
समाज आगेराचा सण (Harvest Festival) दरवर्षी मोठ्या उत्सवाने साजरा करत असतो.
दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या रविवारी हा सण साजरा केला जात असतो.
या दिवशी सकाळी अगदी पहाटे आपल्या पारंपरिक वेशभूषा मध्ये नटून-थटून वाजत- गाजत आपल्या भात शेतामध्ये जाऊन शेतीची पूजा- अर्चना केली जाते. भातशेतीचे पहिले फल विधीपूर्वक कापणी करून आपल्या बैलगाडीमध्येे भरले जाते, भाताची कापलेली ताजी कणसे घेऊन वाजत- गाजत मिरवणुकीने चर्च मधील पवित्र वेदीजवळ ते विधिपूर्वक अर्पण केले जाते. आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी या वर्षी ईश्वराने चांगले व मुबलक धान्य दिले याबद्दल देवपित्याचा गौरव करून त्याचे आभार मानले जातात. आभाराचा पवित्र विधी संपल्यानंतर सर्व ईस्ट इंडियन समाज बांधव एकमेकांना आगेराच्या सणाच्या शुभेच्छा देतात. बँडच्या तालावर नाचून जल्लोष करून सण साजरा केला जातो. संपूर्ण धर्मग्रामात आगेराच्या सणानिमित्त दिवसभर आनंदाचे वातावरण असते. प्रत्येक घरात भात शेतीच्या पहिल्या धान्याचे गोडधोड बनवून एकमेकांना भरवले जाते.
अनेक पॅरिसमध्ये संध्याकाळी वेगवेगळ्या ईस्ट इंडियन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून या सणाचा आनंद द्विगुणीत केला जात असतो.
चौकट :आगेरा सण मुंबईतील खारोडी, राठोडी,मालवणी गाव, मार्वे, मढ, मनोरी गाव, गोराई उत्तन, भायंदर, वर्सोवा, जुहू, कालिना सारख्या ईस्ट इंडियन बाहुल्या वास्त्यात उत्साहात साजरा होतो
