प्रतिनिधी:मिलन शाह

मुंब्र्यातील 9 बेकायदा धोकादायक इमातीवरील न्यायलीन कारवाई प्रलंबित असतानाच, कळव्यातील सुमारे वीस अनाधिकृत बांधकामांची यादीच बाहेर आली आहे. गेले तीन दिवस अतिक्रमण विभागाकडून कळव्यात कारवाई सुरु असतानाही कळव्यातील खाडीसह, विटावा, खारेगाव आदी भागात अनाधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचे चित्र आहे. असेच काहीसे चित्र मुंब्रा, कोपरी, घोडबंदर भागात आहे. कोपरीत6 अनाधिकृत बांधकामे सुरु असून उथळसर प्रभाग समिती पासून काही अंतरावर अनाधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. घोडबंदर भागात महापालिकेच्या आरक्षित भुखंडावर टर्फ विकसित केल्याचे दिसून येत आहे. दिव्यात चाळी तसेच तीन ते चार मजल्यांच्या इमारती उभ्या राहत असून या बांधकामांची संख्या मोठी असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. गेल्या दिवाळीत दिव्यात रस्त्याच्या कामात अडसर ठरणाऱ्या अनाधिकृत इमारतींवर पालिकेने कारवाई केली होती. या इमारतीतील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी पालिकेवर आली होती. त्यामुळे अशा बांधकामे रोखण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. महापालिकेची पथके बेकायदा बांधकामावर कारवाई करताना केवळ भिंती तोडण्याचे काम करतात. त्यामुळे त्याठिकाणी पुन्हा बांधकामे केली जात असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही महिन्यात महापालिकेने बेकायदा बांधकामांवर कारवाई करत ३१ जणांवर एमआरटीपीतंर्गत कारवाई केली. तरिही बेकायदा बांधकामे उभारणीचे सत्र भुमाफियांकडून सुरुच असल्याचे दिसून येते. या बांधकामांमुळे पाणी, वीज तसेच इतर सोई सुविधावर ताण वाढत आहे. ठाण्यात क्लस्टर योजना राबविण्याचा पालिकेचा विचार आहे. परंतु अनेक भागात आधीच बेकायदा बांधकामांमुळे नियमापेक्षा जास्त चटई क्षेत्र वापरले गेले असून यामुळे क्लस्टर योजना राबविताना पालिकेला तारेवरची कसरत करावी लागते. त्यात नव्या बेकायदा बांधकामामुळे क्लस्टर योजनेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जी.जी. गोदेपुरे, उपायुक्त, ठाणे महापालिका
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सातत्याने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येते. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी कारवाई करण्यात येते. तसेच पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतरही कारवाई करण्यात येते. काही वेळेस पावसाळामुळे बेकायदा बांधकामांवर कारवाई करणे शक्य होत नाही.