
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मुंबई: मालाड, गोराई, चारकोप, मालवणी आणि दहिसर परिसरातील खारफूट पट्टा उध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी मुंबईकरांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता कांदिवली पश्चिम येथील टर्जन पॉईंट, सेक्टर ८, चारकोप येथे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विद्यार्थी, पर्यावरण तज्ञ, शिक्षक, नोकरदार, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमात खारफुटीचे पर्यावरणीय महत्त्व, पूरनियंत्रणातील तिची भूमिका, जैवविविधतेचे संरक्षण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर तिचे योगदान याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. विकासाच्या नावाखाली खारफुटीचा नाश झाल्यास पर्यावरणावर व मुंबईकरांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांवरही चर्चा होणार आहे.
मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसेच राज्य शासन यांना वर्सोवा–दहिसर कोस्टल रोड प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांविषयी नागरिकांकडून निवेदन देण्यात येणार असून जनहितार्थ हा प्रकल्प पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
परिसरातील नागरिकांना याबाबत जागरूक करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, आपल्या आणि पुढील पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी सर्व मुंबईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Mumbaikars must join in big numbers