एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) फेब्रुवारी २०२६ मधील चलनविषयक धोरण आढावा बैठकीनंतर रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम राहिला असून गृहकर्ज व इतर कर्जांच्या ईएमआय कमी होण्याच्या अपेक्षांना धक्का बसला आहे.
आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या व दुसऱ्या तिमाहीसाठी महागाईचा अंदाज वाढवून अनुक्रमे ४ टक्के व ४.२ टक्के असा जाहीर केला आहे. यामुळे महागाईच्या बाबतीत मध्यवर्ती बँक अधिक सावध भूमिका घेत असल्याचे संकेत मिळतात.
आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, अलीकडील घडामोडींमुळे आर्थिक वाढीचा दृष्टिकोन सकारात्मक असून भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. मात्र सध्या व्याजदरात कपात करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तज्ज्ञांच्या मते, केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये भांडवली खर्चात वाढ, नियंत्रित राजकोषीय तूट आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सकारात्मक घडामोडी लक्षात घेता रेपो दरात कपात होण्याची शक्यता कमी होती. मागील वर्षभरात आरबीआयने चार वेळा एकूण १२५ बेसिस पॉइंट्सची कपात केली होती, मात्र यावेळी दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.
Ohhh