
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा बाबू डे.
मुंबई :२६ जानेवारी २०२६ रोजी देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण कार्यक्रमात संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे डॉ. आंबेडकर यांचा अवमान झाल्याची भावना व्यक्त होत असून, याविरोधात राज्यभर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ही बाब नाशिक येथे कर्तव्यावर असलेल्या वनरक्षक महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी निडरपणे समाजमाध्यमांवर उघड केली. त्यानंतर संपूर्ण भीम समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून महाराष्ट्रभर निषेध मोर्चे व ‘जोडे मारो’ आंदोलन सुरू झाले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व बौद्धजन पंचायत समिती गट क्रमांक २९ यांच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. मालाड विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष तसेच बौद्धजन पंचायत समिती गट क्र. २९ चे विश्वस्त गटप्रतिनिधी आयु. सुनील गमरे यांच्या नेतृत्वाखाली मालाड रेल्वे स्थानक (पश्चिम) येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेस ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.
यावेळी सुनील गमरे यांनी मुख्यमंत्री यांनी तात्काळ गिरीश महाजन यांचा राजीनामा घ्यावा व त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी ठाम मागणी केली. ही मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
या आंदोलनात आय.पी.आय. कामगार नेते महाराष्ट्र प्रदेशाचे प्रकाश बनसोडे यांनीही या घटनेचा निषेध करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या वेळी आय.पी.आय. मालाड सरचिटणीस शंकर वाकळे, तालुका संघटक सिद्धार्थ सहजराव, उपाध्यक्ष जितेंद्र जोगी व सुनील मगर, अतिरिक्त सचिव प्रभाकर निकम, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ८३५ चे सरचिटणीस अजित पवार, विविध वार्ड व शाखांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने भीमअनुयायी उपस्थित होते.
पण युतित आपला पक्ष ही सहभागी आहे।