एसएमएस-प्रतिनिधी.
मुंबई : मालाड पश्चिमेतील राजन पाडा, पन्नालाल घोष मार्ग येथे फळांवर उंदीर मारण्याचे औषध लावत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित फळ विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
माहितीनुसार, उत्तर भारतीय फळ विक्रेता फळांवर ‘रॅटोल’ हे उंदीर मारण्याचे औषध लावत असल्याचा प्रकार मनसे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आला. मनसेचे कार्यकर्ते कुनाल साळुंखे यांनी काही दिवस पाळत ठेवून संबंधित विक्रेत्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर हा व्हिडिओ मालाड पोलीस ठाण्यात सादर करण्यात आला.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत फळ विक्रेता मनोज कुमार केसरवानी आणि त्याचा साथीदार बिपीन कुमार केसरवानी यांना ताब्यात घेतले. दोघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यन्त चव्हाण यांनी माध्यमांना माहिती दिली.
दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना मनसेचे उपविभाग सचिव जब्बार शेख यांनी मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर कठोर कारवाईची मागणी केली. “मुंबईत फेरीवाला मुक्त मोहिमेची घोषणा झाली होती. मात्र परिस्थिती पुन्हा पूर्ववत होत आहे. परप्रांतीय फेरीवाल्यांची सखोल चौकशी करून अशा कृत्यांवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
फार धक्कादायक गोष्ट आहे याना फाशीशीची शिक्षा झालीच पाहिजे