
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
इचलकरंजी : कोल्हापूर जिल्हा भारत स्काऊट व गाईड तर्फे चिंतन दिनानिमित्त आयोजित कब, बुलबुल, स्काऊट-गाईड व बनी मेळावा उत्साहात पार पडला. या जिल्हास्तरीय मेळाव्यात इचलकरंजी येथील मालती माने विद्यालयाच्या कब, बुलबुल आणि बनी पथकांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
मेळाव्यात विविध स्पर्धा, प्रात्यक्षिके, शिस्तबद्ध संचलन, सादरीकरणे, हस्तकला, गाठी बांधणे, प्रथमोपचार कौशल्य तसेच अनुषंगिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण यांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत परीक्षकांची मने जिंकली. कब-बुलबुल पथकाला मुख्याध्यापक संजय रेंदाळकर व मनिषा कांबळे यांनी मार्गदर्शन केले, तर बनी पथकासोबत जोती पाटील आणि सुप्रिया माने यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.
विशेषतः ‘मोगली आणि तारा’ या गोष्टीच्या सादरीकरणात तसेच उत्कृष्ट पथक व सजावट प्रात्यक्षिक स्पर्धेत कब-बुलबुल पथकाने प्रथम क्रमांक पटकावला. बनी गटाने ‘पाणी वाचवा’ या विषयावर प्रभावी मुकनाट्य सादर करून नाटुकले उपक्रमात प्रथम क्रमांक मिळवला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अध्यक्ष अमरसिंह माने, सचिव शिवाजी जगताप, प्रशासक विमल काटकर, स्काऊट-गाईड पदाधिकारी तसेच पालकांनी अभिनंदन केले.
प्रा. डॉ. विलास पवार यांनी चिंतन दिनानिमित्त संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या कार्याची आठवण करून देत विद्यार्थ्यांनी सेवाभाव, शिस्त आणि देशप्रेमाची शिकवण आत्मसात करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जिल्हा संघटक कविता चौगुले यांनी स्काऊटिंगमुळे विद्यालयाचा लौकिक जिल्ह्यात अधिक उंचावेल आणि विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन ही चळवळ अधिक बळकट होईल, असा आशावाद व्यक्त केला.

Very good
सर्वांचे हार्दिक अभिनंदन
खुप खुप शुभेच्छा आपणास