
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : मालाड पश्चिम येथील आक्सा चौपाटीवर रविवारी दिनांक ३१ रोजी,दुपारी सुमारे ४.१५ वाजण्याच्या सुमारास तीन युवक समुद्रात बुडण्याच्या स्थितीत असताना जीवरक्षकांच्या तत्परतेमुळे त्यांचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, सद्दीक इनामुल्लाह खान (वय २१), रेहान फैजू खान (वय २०) आणि हाशिम खुर्शीद सिद्दीकी (वय २०) हे तिघेही मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरातून आक्सा चौपाटीवर पोहण्यासाठी आले होते. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात जाऊन बुडू लागले.
यावेळी ड्युटीवर तैनात असलेल्या जीवरक्षक जयेश कोळी, केतन भांजी आणि मन वैती यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ समुद्रात धाव घेतली. त्यांनी तिघांनाही सुरक्षितपणे बाहेर काढून प्राथमिक मदत दिली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बचाव करण्यात आलेल्या तिघा युवकांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. या धाडसी बचावकार्याबद्दल जीवरक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.