
एसएमएस-प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले.
ठाणे : आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पाड्यांच्या पुनर्वसनासह तेथील रहिवाशांना भेडसावणाऱ्या विविध मूलभूत समस्यांबाबत महत्त्वपूर्ण भेट घेण्यात आली.
या भेटीदरम्यान पाड्यांच्या पुनर्वसनासह पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी प्रश्नांवर आमदार प्रकाश दादा सुर्वे यांचे चिरंजीव राज दादा सुर्वे यांनी मागण्यांची सविस्तर व मुद्देसूद मांडणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण विषय गांभीर्याने ऐकून घेतला.
त्यानंतर मंत्रालयाकडे जात असताना मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित असलेल्या पाड्यातील रहिवाशांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. रहिवाशांच्या समस्या समजून घेऊन त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र ठाकूर यांनी संबंधित मागण्यांचे निवेदनपत्र उपमुख्यमंत्री महोदयांना सुपूर्त केले. तसेच या संपूर्ण विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी लवकरच मंत्रालयात पुन्हा एक बैठक घेण्याबाबतही उपमुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
या भेटीमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पाड्यांमधील रहिवाशांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.