एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक.
मुंबई : स्वा.सै.वासु देशपांडे जन्मशताब्दी अभियान अंतर्गत कोरगावकर हायस्कूल येथे समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, तसेच शिक्षणाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात विजय देशपांडे यांचे हस्ते साने गुरूजी यांचे प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी केले. इंद्रायणी पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. संजय रेंदाळकर प्रास्ताविकात म्हणाले की, मुलांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करणारे लोक हे खर्या अर्थाने समाजसेवा करतात, ती वासू देशपांडेंसारख्या व्यक्ती आयुष्यभर करत राहिले.
यावेळी विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या, लेखनसाहित्य तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे विजय देशपांडे यांनी शिक्षणाच्या माध्यमातूनच उज्ज्वल भविष्य घडविता येते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष नेहा काणकेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नियमित शिक्षण, वाचनाची सवय, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमास संध्या वाणी, अवधूत खचनाळे, अशोक वरुटे, भरत शास्त्री अलगौडर, सुरेखा पोवार, निलेश बनगे, प्रसाद रेळेकर, सदाशिव र्हाटवळ व उपस्थित विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ मिळते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
तृप्ती रावराणे यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी उपस्थितांचे आभार हेमलता पाटील यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे नियोजन संयोजन समितीने उत्कृष्टरीत्या केले. उपस्थित मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पालक व नागरिक यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

