सरकारच्या निष्क्रियतेविरोधात शेतकऱ्यांचा हळहळता आवाज!
प्रतिनिधी | एसएम समाचार-सुरेश बोर्ले
भारत हा कृषिप्रधान देश आहे — पण या कृषिप्रधान राष्ट्रात शेतकरी मात्र अजूनही उपेक्षितच राहिला आहे. महाराष्ट्रातील बळीराजाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय असून, एकीकडे पिकांना भाव नाही, तर दुसरीकडे बँकांचे कर्ज, नैसर्गिक आपत्ती आणि सरकारी उदासीनता यांनी त्याचे जीवन उद्ध्वस्त केले आहे.
अलीकडील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेली किंवा कुजून गेली आहेत. सरकारकडून मदत मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र अनेक पंचनामे अजूनही बाकी आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झालेत, त्यांनाही अद्याप मदतीचे पैसे मिळालेले नाहीत. दिवाळी जवळ आली तरी या बळीराजाला न्याय मिळालेला नाही, ही खेदजनक बाब आहे.
दरम्यान, शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “पिठलं-भाकरी आंदोलन” करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी होऊन सरकारच्या निष्क्रियतेविरुद्ध संताप व्यक्त केला. त्यांनी प्रतीकात्मक पद्धतीने पिठलं-भाकरी खाऊन आपला निषेध नोंदवला.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की —
“बँक वसुलीचा तगादा चालू आहे, कर्जमाफी शक्य नाही, आणि मदतीचे पैसेही मिळाले नाहीत… मग आम्ही जगायचं कसं?”
सरकारने आधीच कर्जमाफी शक्य नसल्याचे स्पष्ट केले असले तरी, पूरग्रस्त बळीराजा आजही सरकारच्या आश्वासनांच्या प्रतीक्षेत आहे.
शेतकरी वर्गाची एकच अपेक्षा —
“आता तरी आमची दखल घ्या, अन्यथा आंदोलन तीव्र होईल!”
बळीराजा तुझ वाली कोणीच नाही