
एसएमएस -प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे
मुंबई : मालाड पश्चिमेतील स्वामी विवेकानंद रस्त्यावर शंकर मंदिरासमोर भला मोठा खड्डा पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते.
या खड्ड्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक दुचाकींची चाके खड्ड्यात अडकून अपघात झाल्याच्या घटना घडल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसामुळे खड्ड्यात पाणी साचत असल्याने त्याचा अंदाज न आल्यामुळे अपघाताचा धोका आणखी वाढला आहे.
या धोकादायक खड्ड्याची महानगरपालिकेने तातडीने दखल घेऊन दुरुस्ती करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या समस्या टाळण्यासाठी रस्त्यांची नियमित देखभाल करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.