
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : महानगरपालिकेच्या मालाड पी-पश्चिम विभागातील अतिक्रमण निर्मूलन खात्याद्वारे कारवाईदरम्यान जप्त केलेला माल मालाड एवरशाईन मुतुमारी नगर, शिवशक्ती एसआरए बिल्डिंगसमोर, पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ असलेल्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात येतो. मात्र, या गोडाऊन परिसरात मोठ्या प्रमाणात घाण, कचरा तसेच जप्त केलेला भाजीपाला आणि इतर वस्तू साचल्याने गंभीर अस्वच्छतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी योग्य देखभाल व नियमित स्वच्छतेचा अभाव असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी दुर्गंधी पसरली असून मोठ्या प्रमाणात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे तेथील कामगारांमध्ये डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांची लक्षणे दिसून येत असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरात दोन ते तीन साप आढळून आल्याने परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे कीटक व सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्रमाण वाढल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे कामगारांमध्ये तसेच आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनल्याने कामगारांनी तातडीने या गोडाऊनमधून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. तसेच, या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुरक्षा साधने, औषधोपचार व आरोग्य तपासणीचीही गरज व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनीही या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. गोडाऊन परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबवणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि कीटकनाशक फवारणी करणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने स्वच्छता, कीटकनाशक फवारणी तसेच सुरक्षित साठवणुकीची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असून सार्वजनिक आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशाराही स्थानिकांकडून देण्यात येत आहे.
BMC तुझास्वतावर भरोसा नाय का?