
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा बाबू डे.
मालाड, ता. २६(प्रतिनिधी ) वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित असलेल्या मालाड पश्चिम येथील मढ परिसरातील धारवली गावाला अखेर नळपाणी जोडणी मिळाली आहे. रिपाई (अ ) चे मालाड विधानसभा अध्यक्ष सुनील गमरे यांच्या अथक प्रयत्नांना यश.
गेल्या एक वर्षापासून महानगरपालिकेकडे सातत्याने पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करून गमरे यांनी हा प्रश्न मार्गी लावला. यापूर्वी गावातील नागरिकांना ३ ते ४ किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागत होते. आता गावातच नळपाणी मिळू लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल सुनील गमरे यांनी मालाड (प.) पी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला व आभार मानले. तसेच या कामात सहकार्य करणारे जलखाते व इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
धारवली हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आदिवासी पाडा म्हणून अस्तित्वात असलेले गाव असून, आजपर्यंत मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित होते. या कामासाठी रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले यांनीही पत्र देऊन पाठपुरावा केला होता.
यावेळी गावातील महिला कार्यकर्त्या व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सुनील गमरे यांनी मार्वे रोड मुख्य रस्ता ते आक्सा गावाजवळील धारवलीपर्यंत डांबरी किंवा सिमेंट काँक्रीट रस्ता तसेच इतर नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही प्रशासनाकडे केली आहे..