
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
मुंबई : कांदिवली (पूर्व) : कांदिवली (पूर्व) येथील प्रभाग क्रमांक २९ मधील बुद्ध कॉलनी, राम नगर आणि राजगुरू उड्डाणपुलाखाली सुरू असलेल्या मान्सूनपूर्व नाला सफाई कामामध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सम्राट बागुल यांनी केला आहे. नाल्यातून काढण्यात आलेल्या सील्ट (गाळ) मध्ये डेब्रिज, माती, दगड आणि इतर बांधकाम साहित्य मिसळून त्याचे वजन कृत्रिमरीत्या वाढवले जात असल्याने सार्वजनिक निधीच्या अपव्ययाची शक्यता निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बागुल यांच्या म्हणण्यानुसार, मागील महिनाभर विविध ठिकाणांहून काढण्यात आलेला गाळ घटनास्थळी साठवून ठेवण्यात येत होता. त्यानंतर मोठे दगड, ब्लॉक, माती आणि इतर डेब्रिज साहित्य वाहनांद्वारे आणून त्या गाळामध्ये मिसळले जात असल्याचा आरोप आहे. पुढे जेसीबीच्या सहाय्याने हे मिश्रित साहित्य ट्रकमध्ये भरून वजनासाठी पाठविले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
१ जून २०२६ रोजी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीदरम्यान एका वाहनामध्ये भरलेल्या साहित्यामध्ये डेब्रिज मिसळलेले आढळल्याचा दावा बागुल यांनी केला. स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ५०० हून अधिक वाहनांद्वारे अशा प्रकारच्या साहित्याची वाहतूक झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नाल्यातील गाळाचे वजन कृत्रिमरीत्या वाढवून संबंधित कंत्राटदारांकडून जादा बिले सादर केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता असून संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सम्राट बागुल यांनी केली आहे. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून सुरक्षित ठेवणे, सर्व संबंधित वाहनांचे ट्रिप रेकॉर्ड आणि वजन पावत्यांची तपासणी करणे, संशयित देयके व बिले रोखणे, दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर विभागीय तसेच फौजदारी कारवाई करणे, अशा मागण्याही त्यांनी प्रशासनाकडे केल्या आहेत.
मुंबईकरांच्या कररूपाने जमा होणाऱ्या निधीचा योग्य वापर होणे आणि सार्वजनिक कामांमध्ये पारदर्शकता राखणे आवश्यक असल्याने प्रशासनाने या स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे.